वॉकरच्या साहाय्याने चालत ती खिडकीपाशी गेली. धुक्याच्या चादरीला छिद्र पाडत सूर्याची किरणे धरणीला स्पर्श करण्यासाठी आतुर झाली होती. सूर्याच्या येण्याने खरंच वातावरण उत्साहीत झाले होते.तिची नजर समोरच्या रोपट्यावर गेली. कुठे पानांवर दवबिंदू उठून दिसत होते तर कुठे ते घरंगळून पडत होते.”माझे आयुष्य ही माझ्या हातून असेच निसटून जात आहे”,असे म्हणून ती उदास झाली.
कॅन्सरने तिचे शरीरचं नाही तर मनही पोखरले होते. हातातून जे निसटून चाललं आहे त्याच दुःख मानण्यापेक्षा जे उरलं आहे त्यात समाधान मानून आई बाबांसाठी जगायचं हे तिने कधीच ठरवल होत. ह्या सर्व विचारात तिच्या मनातल दुःख अश्रु बनून कधी वाहू लागले आणि त्या रोपट्याच्या पानावरील दवबिंदूत कधी एकरूप झाले तिला कळलेच नाही.
डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.

