आजच्या Modernisation आणि Digitalisationच्या काळातही आपल्या मुलांना आपल्या संस्कृतीची , इतिहाची माहिती असावी यासाठी सागर आणि अवनी सतत प्रयत्नशील असत.
एकदा त्यांच्या घरी सागरचे मित्रमंडळी जेवणासाठी आले होते. छान गप्पांचा कार्यक्रम रंगला होता. मुले तिथेच एका कोपऱ्यात बसून खेळत होती. इतक्यात सागरचा एक मित्र समोरच्या भिंतीवर असलेल्या शिवरायांच्या फोटोला पाहून म्हणाला,”अरे सागर,शिवाजीचा हा फोटो छान आहे रे,कुठून घेतला?”
सागर काही बोलणार इतक्यात त्याचा आठ वर्षांचा लेक समर म्हणाला,” शिवाजी नाही, शिवाजी महाराज म्हणा, त्यांचं नाव आदरानेच घ्यायचं.” समरच बोलणं ऐकून सर्वच चाट पडले. त्या मित्राने समरला सॉरी म्हटले. यापुढे मी शिवाजी महाराजच म्हणेन,असे आश्वासन दिले.
आपण मुलांमध्ये जे रुजवू पाहतो आहोत ते साध्य होतंय हे पाहून सागर आणि अवनी मनोमन सुखावले.
डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.


